Operation Tiger Active : ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये का अडकले? कारण आलं समोर
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून देणारी नाट्यमय घडामोड (Operation Tiger Active) समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Operation Tiger Active : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून देणारी नाट्यमय घडामोड (Operation Tiger Active) समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger Active) सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, उद्धव ठाकरेंचे तब्बल ६ खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे, हे सर्व खासदार सध्या ‘नॉट रिचेबल’ असून ते बुधवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देण्याचे पत्र सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरे गटाच्या बैठकीला खासदारांची दांडी; संशयाची पाल चुकचुकली
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर, १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या ९ खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला ९ पैकी केवळ ४ खासदारांनीच हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात संशयाची पाल चुकचुकली.
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव (खासदार, परभणी) , नागेश पाटील आष्टीकर (खासदार, हिंगोली), ओमराजे निंबाळकर (खासदार, धाराशिव), संजय देशमुख (खासदार, यवतमाळ-वाशिम), भाऊसाहेब वाकचौरे (खासदार, शिर्डी) यांचा समावेश आहे.
चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल; एकनाथ शिंदे घेणार भेट
मंगळवारी संध्याकाळी ७:३० वाजता नांदेड विमानतळावरून एक चार्टर्ड विमान दिल्लीसाठी रवाना झाले. या विमानात परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळचे संजय देशमुख यांच्यासह एकूण ३ खासदार असल्याचे समजते. हे सर्व खासदार दिल्लीत पोहोचले असून त्यांचे फोन बंद आहेत.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तडकाफडकी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. बुधवारी सकाळी शिंदे आणि या ‘नॉट रिचेबल’ खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यानंतर हे खासदार लोकसभा अध्यक्षांना आपल्या पाठिंब्याचे पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदारांनी का सोडली ठाकरेंची साथ?
संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघात मोठा निधीही देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले आहे.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही त्यांच्या मतदारसंघात मोठा निधी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले आहे. त्याचसोबत 2029 साली त्यांना तिकीट देऊन पुन्हा खासदार करण्याचा शब्दही दिल्याची माहिती आहे.
ओमराजे निंबाळकर यांचेही नाव ऑपरेशन टायगरच्या यादीत असल्याची माहिती आहे. त्यांच्या भावाच्या संबंधित बँकेचे प्रकरण मिटवण्याचं आणि त्यांच्या मामांच्या कंपनीचं काम सुरळीत करण्याचा शब्द त्यांना दिल्याचे समजत आहे.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भविष्य दिसत नसल्याने त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
थोडक्यात काय तर आधी आमदार आणि आता थेट खासदारांना खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याची तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या घडामोडींवर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.






