Rahul Gandhi : “परराष्ट्र धोरण म्हणजे नेत्यांना मिठी मारणे…”; राहुल गांधी यांनी उडविली खिल्ली
नरेंद्र मोदी यांच्या मते परराष्ट्र धोरण म्हणजे नेत्यांना मिठी मारणे, ही गोष्ट त्यांच्या मनात कुठेतरी पक्की बसली आहे, अशा शब्दांत त्यांनी परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली.

Rahul Gandhi – जंतर-मंतरवर काय घडत होते ते सर्व देशाने पाहिले. तिथे विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करायचे होते. मात्र, सरकार लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्यापासून रोखत आहे.
भाजप आणि संघाला त्यांची राजकीय विचारधारा देशावर लादायची आहे, तर काँग्रेसचे काम भारताला आपले म्हणणे मांडण्याची संधी देणे आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
नवी दिल्लीतील इंदिरा भवनात आयोजीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधी बोलत होते. यात सामाजिक संघटना, कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील लोक, कलाकार, समुदाय प्रतिनिधी आणि नागरिक समाजाशी संबंधित लोकांनी भाग घेतला.
राहुल गांधी म्हणाले, भाजप-संघाला भारताची काहीच समज नाही. मूळ शक्ती म्हणून संघ संघटना संपली असून ती आता मोठ्या भांडवलशाहीचे म्हणजेच अदानी आणि अंबानी यांचे एक साधन बनली आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते परराष्ट्र धोरण म्हणजे नेत्यांना मिठी मारणे, ही गोष्ट त्यांच्या मनात कुठेतरी पक्की बसली आहे, अशा शब्दांत त्यांनी परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली.
विद्यार्थी त्रस्त होते आणि त्यांना आपली व्यथा मांडायची होती, परंतु सरकारने त्यांना तसे करण्यापासून रोखले. सरकारला हे समजले आहे की, लोक आता शांत राहणार नाहीत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कधीकाळी चाणक्य आणि सरदार पटेल
यांसारख्या नावांनी संबोधले जात होते, पण आता ते संसदेत प्रवेशही करू शकले नाहीत. असे यासाठी झाले आहे कारण पहिल्यांदाच त्यांना भारताच्या आवाजाला आणि त्याच्या अभिव्यक्तीला सामोरे जावे लागत आहे.
भारतात अनेक लोक भित्र्यांसारखे वागत आहेत. जर तुम्ही ब्रिटिश साम्राज्याशी लढत असाल आणि भीती वाटत असल्याचे म्हणत असाल तर ते समजण्यासारखे आहे. पण आज तुम्ही त्यांच्याशी लढत आहात, ज्यांना आपल्या तत्त्वज्ञानाचे किंवा इतिहासाचे कोणतेही ज्ञान नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.





