Uddhav Thackeray : वर्धापन दिनादिवशी मोठा राजकीय भूंकप? उद्धव ठाकरेंचा ‘प्लॅन बी’ काय? मोठी माहिती समोर
Uddhav Thackeray : हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे बोलले जात आहे. यामुळे कोणत्याही क्षणी राजकीय भूंकप होऊ शकतो असे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटातील काही खासदारांना आपल्या गोटात आणण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या चर्चांना आता अधिक वेग आला असून, हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे बोलले जात आहे. यामुळे कोणत्याही क्षणी राजकीय भूंकप होऊ शकतो असे बोलले जात आहे.
14 जुनला मातोश्रीवर उबाठा गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावण्यात आलेल्या बैठकीला ठाकरे गटाच्या नऊपैकी पाच खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी, “ज्यांना जायचे आहे त्यांना जबरदस्तीने थांबवण्यात अर्थ नाही,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
जरी आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सार्वजनिकपणे सांगितले असले, तरी काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू असल्याचे समजते. त्यामुळे संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून नेमकं काय केलं जात आहे, याची एक संभाव्य माहिती समोर आली आहे.
खासदारांनी पक्ष सोडला तरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षासोबत राहावेत, यासाठी उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाची एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सर्व खासदार पक्षासोबतच आहेत, असा संदेशही बैठकीत देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, ज्या खासदारांबाबत चर्चा सुरू आहे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे समजते.
19 जूनला मोठा राजकीय भूंकप?
या सगळ्या घडामोडी घडत असताना येत्या काही दिवसांत म्हणजेच 19 जून या दिवशी शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन असल्याने याच दिवशी संधी साधत मोठा भूंकप राज्याच्या राजकारणात घडू शकतो अशी शक्यता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे या दिवशी नेमकं काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
दोन्ही शिवसेनेकडून जय्यत तयारी
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांचा गट मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू असून, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर, ठाकरे गटाचा वर्धापन दिनही लवकरच पार पडणार असून, या कार्यक्रमात उद्धव ठाकरे खासदारांच्या संभाव्य फुटीबाबत काय भूमिका मांडतात आणि सर्व नऊ खासदार उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






