Onion Farming – कांदा लागवड व योग्य पद्धतीने संगोपन केल्यास शेतकऱ्याला एकरी चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.कांद्याला पुरेसा बाजारभाव नसला तरी गळीत चांगले निघाल्यावर उत्पन्न वाढवून नफा वाढीसाठी हातभार लागत आहे.पेठ येथील शेतकरी विशाल यशवंत तोडकर म्हाणाले, माझ्या शेतात कांदा लागवडीसाठी एकरी सुमारे ४ किलो बियाणे लागले. यासाठी अंदाजे २ हजार ५०० रुपये खर्च आला. लागवडीसाठी २० मजुरांवर सुमारे ८ हजार रुपये खर्च झाला. यासोबतच खते १० हजार रुपये, औषधे ९ हजार रुपये, काढणीसाठी २० मजूर ६ हजार रुपये आणि कांदा काढणीसाठी ९ हजार रुपये असा खर्च आला.पॅकिंगसाठी २०० पिशव्या प्रत्येकी ११ रुपये प्रमाणे सुमारे २ हजार २०० रुपये खर्च आला. अशा प्रकारे सर्व खर्च वजा जाता एकरी अंदाजे ५० हजार रुपये खर्च झाला. एकरी सरासरी २०० पिशव्यांचे उत्पादन निघाले.एका पिशवीचे वजन सुमारे ५५ किलो असून बाजारभाव १७ ते १८ रुपये किलो दराने विकले गेले. यानुसार एकरी एकूण उत्पन्न सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे झाले.सर्व खर्च वजा जाता मला एकरी सुमारे १ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याने कांदा लागवड फायदेशीर ठरत आहे.सध्या कांद्याला अपेक्षित बाजारभाव नसला तरी उत्पादन आणि बाजारभाव यांची योग्य सांगड बसल्यास नफा चांगला मिळू शकतो, असे पेठ येथील शेतकरी धनंजय तोडकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस बाजारभाव स्थिर नसतानाही शेतकरी नवनवीन प्रयत्न करून उत्पन्न वाढवण्याचा ध्यास शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे. हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे आणि इतर खर्च वाढल्यामुळे कांदा उत्पादन घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. पेठ येथील कांदा उत्पादक शेतकरी विशाल तोडकर हा शेतकरी मात्र अपवाद ठरला आहे. अन्यथा हजारातील 700 ते 800 शेतकरी कांदा पिकामुळे गेल्या २ वर्षापासून आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. यावर शासनाने कांदा खरेदी करून हमीभाव योजना चालू करून आर्थिक अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. “कांदा लागवडी आणि उत्पादनासाठी खर्च जास्त असला तरी योग्य नियोजन केल्यास उत्पन्न वाढवून नफा मिळतो. हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी सुधारेल.” – विशाल यशवंत तोडकर, शेतकरी, पेठ. “कांद्याचे उत्पादन भरपूर आहे, मात्र बाजारभाव स्थिर नाहीत. शेतकरी आणि व्यापारी दोघांसाठीही दर स्थिर राहणे गरजेचे असून त्यासाठी शासनाने ठोस धोरण आखावे.” -वसंतराव थोरात,कांदा व्यापारी, मंचर.