Manoj Jarange : “आता राज्यात शिंदे सरकार पाहिजे होते…”; मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठं विधान

Manoj Jarange – सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाबाबत प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागत असेल तर सरकार म्हणून तुम्ही काय केले. आत्तापर्यंत 9 जणांना देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन केल्यामुळेच तुरुंगात टाकले आहे.
पण, सरकार म्हणून तुम्ही काय केले? असा सवाल मराठा अंदोलक मनोज जरांगे यांनी विचारला आहे. तसेच, राज्यात एकनाथ शिंदेंचे सरकार पाहिजे होते, सर्वांना आत टाकले असते, असे म्हणत त्यांनी विद्यमान देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल नाराजी उघड केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये आजपासून ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. फरार आरोपीच्या अटकेसाठी आणि याप्रकरणात काहींना सहआरोपी करण्याची मागणी करत गावकरी आंदोलनाला बसले आहेत. यावेळी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपली भूमिका मांडली.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे काहीही अधिकार नाहीत, त्यांना अधिकार दिले तर आरोपी अटक होतील. देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडून प्रयोग सुरू आहेत, नेत्यांनी येऊन इथे कागदपत्रे घ्यायचे हा प्रसिद्धीचा भाग सुरू झाला आहे, असे म्हणत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तपासावरुन जरांगेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना फोन
जरांगेंनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना देखील फोन करुन संवाद साधला. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, ग्रामस्थ ऐकण्याच्या तयारीत नाहीत, असे म्हणत आंदोलकांच्या मागण्या जरांगेंनी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या.
मस्साजोगमधील नागरिक आजपासून अन्नत्याग आंदोलन करत असून 2000 लोकसंख्या असलेल्या मस्साजोग गावातील किमान 200 पेक्षा जास्त लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.





