मुंबई : तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्री असताना मंजूर केलेल्या आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा होती. मात्र, आता चर्चांवर तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोग्य विभागाच्या कामांना कोणत्याही पद्धतीने स्थगिती दिलेली नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. घोटाळा झाल्याचा आरोप झाला, पण सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी अशिवेशनाला हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून कामांच्या स्थगितीबाबत जो विषय सुरु आहे, त्या विषयाची माहिती घेणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली. अशा कोणत्याही गोष्टीला मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली नाही. आता 3 हजार 190 कोटींचा घोटाळा झाला, त्याआधी 108 गाड्यांच्या बाबतीत 10 हजार, 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असे आरोप झाले. मात्र, यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही. पण आभासी जगात जगायचे आणि घोटाळे झाले म्हणायचे. एखाद्याला बदनाम करायचे हे चुकीचे आहे. मी आरोग्यमंत्री असताना न भूतो न भविष्यति असे तब्बल 24 महिन्यांत 42 निर्णय आरोग्य विभागात घेतले आहेत, असे तानाजी सावंत म्हणाले. राऊतांसाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये जागा ठेवावी शासन म्हणून धोरणात्मक निर्णय घेण आमचे काम असते. टोटल टेंडर 12 हजार कोटींचा असेल तर 12 हजार कोटी म्हणायचे. कुठेही एक रुपया खर्च झाला नाही. हायकोर्टाच्या आदेशाने निर्णय होईल सांगितले. कुत्रा चावतो तर कुत्र्याला चावायचे का? मी कालही म्हटले होते संजय राऊतला मेंटल हॉस्पिटल मध्ये एक जागा रिक्त ठेवली. मी आजही सांगतो, प्रकाश आबिटकरांनी एक सीट ठेवावी, अश शब्दांत तानाजी सावंत यांनी संजय राऊतांवर टीका केली.