Nira Valley Dams: नीरा खोऱ्यात पावसाची जोरदार हजेरी! भाटघर, नीरा देवघरसह ४ धरणांतील पाणीसाठ्यात वाढ सुरू
Nira Valley Dams: नीरा देवघर धरणात सर्वाधिक ३५२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू; आगामी दिवसांतील मुसळधार पावसावरच पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीचे गणित अवलंबून.

Nira Valley Dams – नीरा खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास काहीसी सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (३ जुलै) सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चार प्रमुख धरणांमध्ये एकूण ६.२९५ टीएमसी (१३.०२ टक्के) पाणीसाठा झाला असून, गेल्या २४ तासांत ०.५०९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
मागील वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये २७.०३६ टीएमसी (५५.९४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. त्याच्या तुलनेत यंदाचा साठा तब्बल २०.७४१ टीएमसीने कमी असून, पाणीसाठ्याची टक्केवारीही मागील वर्षी पेक्षा सुमारे ४३ टक्क्यांनी कमी आहे. यंदा मान्सून उशीरा सक्रीय झाल्याचा परिणाम धरणसाठ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. धरणनिहाय विचार करता, नीरादेवघर धरण परिसरात सर्वाधिक ७६ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे १.६६८ टीएमसी (१४.२१ टक्के) पाणीसाठा आहे.
या धरणात ३५२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. भाटघर धरणात पावसाची नोंद नसली तरी २.३०३ टीएमसी (९.८० टक्के) साठा असून १४६ क्युसेक आवक सुरू आहे. वीर धरण परिसरात ७ मिमी पाऊस झाला असून धरणात १.६५० टीएमसी (१७.५४ टक्के) साठा आणि ११ क्युसेक आवक आहे. गुंजवणी धरण परिसरात ४१ मिमी पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा ०.६७४ टीएमसी (१८.२६ टक्के) आहे.
सध्या नीरा खोऱ्यात पावसाने चांगली सुरुवात केली असून, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच खरीप हंगामासाठीही हा पाऊस महत्त्वाचा मानला जात असून शेतकऱ्यांच्या नजरा आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागल्या आहेत.



