Nashik Pune Railway: प्रवाशांच्या स्वप्नांवर पाणी! नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प गुंडाळला; जनतेचा संताप अनावर
Nashik Pune Railway: औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्राला बसणार मोठा फटका; निर्णयाचा पुनर्विचार करण्याची नागरिकांची जोरदार मागणी!

Nashik Pune Railway – नाशिक–पुणे प्रस्तावित सरळ रेल्वे मार्ग रद्द करण्यात आल्याच्या वृत्तानंतर नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रेल्वे मार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव,मंचर, राजगुरूनगर, चाकण आणि पुणे या भागांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. नागरिकांच्या मते, या रेल्वे मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार होता.
सध्या नाशिक ते पुणे हा प्रवास रस्तेमार्गे साडेचार ते पाच तासांचा होत असताना रेल्वे मार्गामुळे हे अंतर सुमारे पावणेदोन तासांत पार करणे शक्य झाले असते. तसेच औद्योगिक, शैक्षणिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली असती. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा सुरू असून भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी या विषयात हस्तक्षेप करून केंद्र सरकारशी चर्चा करावी तसेच प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे. विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.





