Narendra Modi : मी भगवान शिवाचा भक्त; आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले?

आसाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये ६.५ कोटी रुपयांच्या विकास योजनांची मोठी घोषणा केली. यावेळी एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “मी भगवान शिवाचा भक्त आहे, सगळं विष गिळून टाकलं आहे,” असं म्हणत त्यांनी माँ कामाख्याच्या आशीर्वादामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ला यश मिळाल्याचा उल्लेखही केला.
मोदी म्हणाले, “नुकताच भारतरत्न सुधाकंठ भूपेन हजारिका यांचा जन्मदिवस साजरा झाला. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. आसामसाठी आपल्या पूर्वजांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी भाजपचं डबल इंजिन सरकार मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.” यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्याच्या “नाचणं-गाणाऱ्यांना भारतरत्न दिलं जातं” या वक्तव्याचा दाखला देत टीका केली.
काँग्रेसवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले, “१९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर जवाहरलाल नेहरू यांच्या वक्तव्याने ईशान्य भारतातील लोकांच्या जखमांवर परिणाम झाला, ज्या आजही भरल्या नाहीत. काँग्रेसची पुढची पिढी या जखमांवर मीठ चोळत आहे. मला कितीही शिव्या दिल्या तरी मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सगळं विष गिळतो. पण दुसऱ्याच्या निर्लज्जपणे अपमान केला जातो, तो सहन करू शकत नाही असे नरेंद्र मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टम माझ्यावर तुटून पडली आहे. माझ्यासाठी लोक दैवत आहे. माझ्या दैवताजवळ जाऊन बोलू शकत नसेल, तर कुठे बोलेल. तेच माझे स्वामी असून माझ्यासाठी पूजनीय आहे. तेच माझे रिमोट कंट्रोल आहे. त्यांच्याशिवाय कोणी माझं रिमोट कंट्रोल नाही असेदेखील म्हणाले.





