Narayangaon Bypass: पहिल्याच पावसात पोलखोल! खोडद चौक भुयारी मार्गाच्या पुलाला लागली गळती; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
Narayangaon Bypass: लाखोंचा निधी खर्चून तयार केलेला भुयारी मार्ग पहिल्याच पावसात जलमय; महामार्गावरील बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह.

Narayangaon Bypass – पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरील खोडद चौकातील भुयारी मार्गाच्या पुलाला पावसाच्या पाण्याची गळती लागल्याने प्रवाशांमधीन चिंता व्यक्त होत आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या भुयारी मार्गाच्या पुलावरून पहिल्याच पावसात पाणी झिरपत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खोडद चौकातील भुयारी मार्गाचे बांधकाम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.
मात्र, जुन्नर तालुक्यात झालेल्या सर्वसाधारण पावसातही बाह्यवळण रस्त्यावरील पुलातून पाणी गळून थेट भुयारी मार्गात पडत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत नागरिक आणि वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी खोडद चौकात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर स्थानिकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे प्रशासनाने येथे भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला होता.
या कामामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नव्याने बांधलेल्या पुलातूनच पावसाचे पाणी गळू लागल्याने प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खोडद व नारायणगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून गळती थांबवावी व भविष्यात कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
अधिकारी काय म्हणाले?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० चे अधिकारी दिलीप शिंदे म्हणाले, खोडद चौकातील भुयारी मार्गाचे बांधकाम नव्याने करण्यात आले असून बाह्यवळण रस्त्याचे काम दर्जेदार आहे. दुभाजकाच्या भागातून भुयारी मार्गात पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले आहे. गळतीचे नेमके कारण शोधून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. त्यामुळे वाहनचालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.





