Narayan Rane Vs Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे. यावरून आता भाजपचे सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे कोण आहे? त्याची लायकी आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची? अशा शब्दात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. काय म्हणाले नारायण राणे? उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने यांना संपवलं असतं असं उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना उद्देशून बोलले होते. उद्धव तुझी लायकी नाही मोदींना बोलायची. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी बघितला नाही. एकदा एक काम करण्यासाठी याने बिल्डरकडून 3 लाख रुपये घेतले होते. आमच्या रवी शेंडगेकडून मिलिंद नार्वेकरने 3 लाख घेतले होते. आदित्य ठाकरेने 15 टक्के कमिशन घेतले. त्यामुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. तू कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. प्रशासन नाही, कायदा माहीत नाही, काय होणार मुखमंत्री? अशी टीका नारायण राणे यांनी केली. शरद पवारांवर साधला निशाणा आजही शरद पवार जाती-जातीमध्ये लावलावी करत आहेत. शरद पवार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. 83 वय झालं तरी स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे. पवारांनी शांततेचा संदेश दिला पाहिजे, पण ते काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात. पवार सत्तेत येणार म्हणतात, पण अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार का? पुतळा पडल्यानंतर त्यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन तो पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यावर राजकारण करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.