मुंबई – राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात ४,४७८कोटी रुपये रस्ते विकासासाठी उल्लेख आहे. त्यापैकी आठशे ते हजार कोटी रुपये खर्च करून कित्येक वर्षे रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग पूर्ण करावा, अशी मागणी निलेश राणे यांनी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत राणे म्हणाले, कोकणातील काजू उत्पादकांच्या समस्या गंभीर आहेत. कोकणातील अनेक युवक नोकरी सोडून काजू उत्पादनात आले. मात्र, देशात आफ्रिकन काजू मोठ्या प्रमाणात येत असल्याने येथील काजू उत्पादकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नजिकच्या गोवा राज्यात प्रति किलो १७० रुपये दिले जातात. त्या धर्तीवर आपल्या राज्यात निर्णय व्हावा. वनविभागाच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडत ते म्हणाले, एके ठिकाणी झाडे लावा सांगायचे आणि त्याचवेळी झाडे तोडून जंगल साफ करायला परवानगी द्यायची. परिणामी जंगले रिक्त होऊ लागली आणि प्राणी शेतात, गावात शिरु लागले. याचा परिणाम शेतीवर होऊ लागला आहे. वनविभागाचे अधिकारी हे अमराठी असतात, असा आरोप त्यांनी केला. कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रग्सचा फैलाव होत आहे. शाळकरी मुलांंद्वारे ड्रग्जपुरवठा केला जातो. मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आपल्या राज्यात येतात अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना देत सभागृहाला अवाक् करून सोडले. राज्यात गो-हत्या मोठ्ठ्या प्रमाणात होतात, याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.