MNS And Shinde Group In Worli | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असताना वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डोकेदुखी वाढली आहे. वरळीत एक बनावट पत्र व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा द्या, असे बनावट पत्र वरळीमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाटलं असल्याचा आरोप आहे. वरळीमध्ये मनसेने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, अशा प्रकारचे खोटं पत्रक वरळीमध्ये वाटत असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकारही समोर आला आहे. या व्हायरल पत्रानंतर मनसेचे काही पदाधिकारी आग्रीपाडा पोलीस स्टेशनला पोहचले. MNS And Shinde Group In Worli | व्हायरल पत्रात नेमकं काय लिहिले ? “प्रिय वरळीकरांनो, सस्नेह जय महाराष्ट्र. आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात पोहोचलो आहोत. आपणांस मी सांगू इच्छितो की, शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मनसेचा सन्मान केला आहे आणि त्याचेच दायित्व म्हणून मनसेने ठरवले आहे की, हिंदूंच्या मतांचे विभाजन रोखण्यासाठी वरळीत धनुष्यबाणाला पाठिंबा देऊन शिवसेनेला समर्थन देणार आहे. आपल्या मतांचा सन्मान करा आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या. येत्या 20 नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे.” असे फेक पत्र राज ठाकरे यांच्या नावासह व्हायरल केले जात आहे. MNS And Shinde Group In Worli | दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाणे आणि वरळी येथील पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संदीप देशपांडे सध्या वरळी पोलिस ठाण्यामध्ये आहेत. या घटनेमुळे सध्या वरळी मतदारसंघामध्ये तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काय म्हणाले राज ठाकरे? नुकतेच मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरे या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “वरळीतील मतदार सूज्ञ आहे. मी असा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही. मतदारांनी यावर विश्वास ठेऊ नये. ही गोष्ट खोटी आहे,” असे यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वरळी मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. यात मनसेकडून संदीप देशपांडे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि उद्धव ठाकरे सेनेकडून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. हेही वाचा : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी बजावला मतदानाचा हक्क