मुंबईसाठी मनसे अन् उबाठा सोबत नको; काँग्रेसच्या भाई जगताप यांची भूमिका, संजय राऊत यांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले…

Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचे नेते भाई जगताप यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक राज ठाकरे सोडा, पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र लढणार नसल्याचे विधान करत राजकीय बॅाम्ब टाकला आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसेच यामुळे ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे बोलले जात आहे. जगताप यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांनी ‘बोलूद्या त्यांना’ असे म्हणत या विषयावर अधिकचे भाष्य करणे टाळले आहे. यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत धूसफूस असल्याची जोरदार चर्चा सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या भेटीला महाविकास आघाडीतील नेते गेले होते.
या नेत्यांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे देखील सहभागी झाले होते. राज यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेतून अनेक सवाल उपस्थित केले होते. एकीकडे राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होणार असल्याच्या चर्चा असतानाच काँग्रेसच्या नेत्याने मोठा राजकीय बॅाम्ब ऐन दिवाळीत फोडला आहे.
काँग्रेसच्या बैठकीत काय ठरलं? भाई जगताप म्हणाले….
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते असून आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.
कोणत्या राजकीय घामोडी घडणार?
काँग्रेसचे सचिन सावंत यांनी देखील भाई जगताप यांनी केलेल्या दाव्यावर अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता येत्या काही दिवसांत कोणत्या राजकीय घडामोडी घडणार हे पाहणे औच्युक्याचे असणार आहे.
हेही वाचा : “नवीन जागतिक व्यवस्थेतील शक्तिशाली खेळाडू भारत” ; पाक जनरल शमशाद मिर्झा यांच्याकडून भारताची स्तुती





