Maharashtra Politics : साताऱ्यातील राजकारण पुन्हा तापले असून कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. “मी मूळचा भाजपचा असून २०१९ मध्ये जागा वाटपामुळे अपघाताने शिवसेनेत आलो,” असा दावा त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics) माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, “२०१९ मध्ये कोरेगावची जागा शिवसेनेला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं, त्यामुळे मी शिवसेनेत गेलो.” तसेच “मी स्वतःच्या बळावर निवडून आलो आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (Maharashtra Politics) यावेळी त्यांनी पक्षातील नाराजीही उघडपणे व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यातील कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. “हे पहिल्यांदाच नाही, शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर दिसत नाहीत,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थितीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जिल्ह्यात शिवसैनिक उरले आहेत का?” असा सवाल करत स्थानिक नेतृत्वावर टीका केली. (Maharashtra Politics) आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, २०११ पासून त्यांनी भाजपसाठी काम केले असून बूथ स्तरापासून संघटना उभी केली. “माझं संपूर्ण कुटुंब भाजपचं काम करतं,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबत केलेल्या राजकीय भूमिकेबाबत आपण एकनाथ शिंदे यांना पूर्वकल्पना दिली होती, असेही त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे साताऱ्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. (Maharashtra Politics)