गुवाहाटी- आसाम- मिझोरमच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी फोनवरून आपली माफी मागितली असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा यांनी म्हटले आहे.
तसेच मिझोरम आरक्षित वनजमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असून आपण त्यांना ते कदापि करू देणार नाही अशी गर्जना करतानाच कालच्या हिंसाचारात शहिद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रूपये मदतीची घोषणाही शर्मा यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना शर्मा म्हणाले की जेव्हा गोळीबार होत होता, तेव्हा आपण सहावेळा मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यांनी सॉरी म्हटले असून चर्चेसाठी आयजोल येथे येण्याचे मला निमंत्रण दिले आहे. आमच्या सीमेवर पोलीस तैनात आहेत. आमच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत व आमची एक इंच भूमीही आम्ही कोणाला बळकावू देणार नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
हा कोणता राजकीय वाद नाही. हा प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला सीमा वाद आहे. ज्यावेळी दोन्ही राज्यांत कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हाच या वादाला सुरूवात झाली. हा दोन राज्यांतील वाद आहे. दोन राजकीय पक्षांतील नाही, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
हिंसाचार सुरू होण्याचे कारण काय असे विचारल्यावर शर्मा म्हणाले हे एक रिझर्व फॉरेस्ट आहे. असे असताना तेथे वस्ती उभारणे अयोग्य आहे. हा वाद जमीनीसाठी नसून वनसंपदेसाठी आहे. आम्हाला त्या वनाचे रक्षण करायचे आहे. त्या भागात आम्हाला नागरी वस्ती नको आहे.
सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर लक्षात येते की तेथे किती अतिक्रमण झाले आहे. या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही आसाम सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
सीमावर्ती भागात आसाम आणि मिझोरममध्ये झालेल्या संघर्षात काल पाच पोलीस शहिद झाले असून 50 जण जखमी झाले आहेत. तेथे केंद्राने आता सीआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्या असून त्या ठिकाणी आता स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला आहे.