Worli Hit and Run : मिहीर शहा व चालकाची अटक कायदेशीरच; वरळी हिट अँण्ड रन प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक ही कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने सोमवारी दोघांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. अटक करताना ती करण्याची कारणे आपल्याला सांगण्यात आली नव्हती, असा दावा करून मिहीर आणि बिडावत यांनी अटकेला आव्हान दिले होते.
तसेच, अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोघांची अटक कायदेशीर ठरवून त्यांच्या याचिका फेटाळला. दरम्यान, याचिकांवरील युक्तिवादाच्या वेळी एखाद्या व्यक्तिला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे ही निव्वळ एक औपचारिकता असते.
मद्यपान करून बेदरकारपणे गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधासाठी कारणीभूत ठरण्याच्या प्रकरणात तर या नियमाचे पालन न केल्याने फारसा फरक पडत नाही, असे खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले होते. तसेच. गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगितले नसल्याचा दावा करून अटकेला आव्हान देणाऱ्या मिहीर आणि बिडावत यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.
याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. त्यानंतरही त्याला अटकेचे कारण माहिती नाही ? अटकेचे कारण सांगितले नाही म्हणून त्यांची अटक ही बेकायदा कशी ठरते? प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार, कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
प्रकरणाकडे उदाहरण पाहण्याची गरज
याचिकाकर्त्यावरील आरोप लक्षात घेता त्याने मद्याच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, धडकेमुळे, दुचाकीवरून पडलेल्या महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढेच नाही, तर याचिककर्ता इतका घाईत होता की तो फास्टॅग कार्ड मागे विसरला, त्याचाही त्याला विसर पडला. त्यामुळे, या प्रकरणाकडे उदाहरण म्हणून पाहण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.



