लंडन – मेरिलीबोर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) (Marylebone Cricket Club) कडून कसोटी क्रिकेट संदर्भात एक शिफारस करण्यात आली आहे. यानुसार कोणत्याही दोन देशांमध्ये असलेल्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्या किमान तीन असावी. तसेच द्विपक्षीय मालिकेत पाहुण्या संघाचा खर्च यजमान देशाच्या क्रिकेट मंडळाने उचलला पाहिजे, अशीही शिफारस आहे. क्रिकेटचे नियम तयार करत असलेल्या एमसीसीच्या जागतिक क्रिकेट समितीची बैठक दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पार पडली त्यात या शिफारसी केल्या आहेत.
समितीने जारी केलेल्या निवेदनात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेचा निर्णायक सामना न झाल्याबद्दल खेद व्यक्त केला. तर या बैठकीत वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियावरील विजयाचे कौतुक देखील करण्यात आले.
डिसेंबरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची मालिकाही अनिर्णित राहिली होती. पुरुषांच्या कसोटी मालिकेत ३ सामन्यांची आवशक्यता आहे. हा बदल जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमापासून सुरु करण्यात यावे असेही एमसीसीने सुचवले आहे.
एमसीसी पॅनलमधील सदस्य – अध्यक्ष – कुमार संगकारा, सदस्य – क्लेअर कॉनर, कुमार धर्मसेना, सौरव गांगुली, झुलन गोस्वामी, हेदर नाइट, जस्टिन लँगर, इऑन मॉर्गन, रमीझ राजा, रिकी स्केरिट आणि ग्रॅम स्मिथ.