Marco Jansen picks 6 wickets : गुवाहाटी कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सन भारतीय संघासाठी मोठा कर्दनकाळ ठरला. त्याने केवळ फलंदाजीनेच नाही, तर आपल्या भेदक गोलंदाजीनेही भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ६ फूट ८ इंच उंचीच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची निम्मे फलंदाजी एकट्याने संपवली. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव २०१ धावांत गारद झाला आहे. दरम्यान आपल्या अष्टपैलू कामगिरीने मार्को यान्सनने एक खास पराक्रमही केली आहे. यानसनची भेदक गोलंदाजी – मार्को यान्सनने केवळ ४८ धावांत ६ विकेट्स घेत, भारताचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळला आणि दक्षिण आफ्रिकेला २८८ धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. भारतीय खेळपट्ट्यांवर सहसा फिरकीपटूंचे वर्चस्व असते, पण गुवाहाटीत यान्सनची जादू चालली. त्याने आपल्या अचूक बाऊन्सर्सने भारतीय फलंदाजांना फारशी संधी दिली नाही. त्याने ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या विकेट्स घेतल्या. मार्को यान्सनची विक्रमी कामगिरी – विशेष म्हणजे, त्याने घेतलेल्या सहापैकी पाच विकेट्स केवळ बाऊन्सर्सवर मिळवल्या, ज्यावरून त्याचा भारतीय फलंदाजांवरील दबाव दिसून येतो. मार्को यान्सनने कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भारताविरुद्धची ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे आणि भारतीय भूमीवरील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या कामगिरीसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हेही वाचा – Smriti Mandhana : लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची आणि पलाशची तब्येत कशी बिघडली? होणाऱ्या सासूने सांगितला सर्व घटनाक्रम मार्को यान्सन हा भारतीय भूमीवर भारताविरुद्ध ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करण्यासोबतच पाच विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला डावखुरा खेळाडू ठरला आहे. जगातील केवळ तीन खेळाडूंना हा दुहेरी विक्रम करता आला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून यान्सनने २५ वर्षांनंतर हा पराक्रम केला आहे. यापूर्वी, २००० मध्ये निकी बोएने आणि १९७६ मध्ये इंग्लंडच्या जॉन लीवरने ही कामगिरी केली होती. हेही वाचा – स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर आता पलाश मुच्छलची तब्येत बिघडली; नेमकं काय झालं? दक्षिण आफ्रिकेने दिला नाही फॉलोऑन – मार्को यान्सनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघाची दाणादाण उडाली. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात ४८९ धावांचा भला मोठा डोंगर उभारला होता. विशेष म्हणजे २८८ धावांची मोठी आघाडी मिळूनही दक्षिण आफ्रिकेने भारताला फॉलोऑन दिला नाही. भारतीय भूमीवर भारताविरुद्ध २८८ धावांची आघाडी मिळवूनही फॉलोऑन न देण्याची ही पहिलीच वेळ आहे.