ठाकरे गटाची गळती थांबेना! एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी प्रयत्न, तर दुसरीकडे बड्या नेत्यांचे पक्ष प्रवेश

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे नेते पक्ष सोडत आहेत. जळगावच्या एरंडोलमध्ये तीन माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सभापती आणि अन्य अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तसेच शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी शहराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. एरंडोल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले भगवान महाजन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला (ठाकरे गट) मोठा धक्का बसला आहे.
राजकीय समीकरणे बदलणार
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला खूप महत्त्व दिले जात आहे.
अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
दापोलीचे माजी संजय कदम हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मंगळवारी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. याशिवाय संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार भाऊसाहेब पाटील -चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबीर भाई खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, पंचायत समितीचे माजी सभापती राजूनाना मगर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. सोबतच, मुंबईच्या भांडुप येथील माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेविका अंजली नाईक, लोचना चव्हाण यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.





