प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील पहाडदरा येथील आदिवासी ठाकरवस्तीला अद्याप पक्का रस्ता न झाल्याने ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पहाडदरा-ठाकरवाडीला डांबरी रस्ता लवकरात लवकर करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा मागणी व पाठपुरावा करून देखील उडवा उडवीची उत्तरे देत दुर्लक्ष केले जात असल्याने व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही रस्त्याचा विषय मार्गी न लागल्याने “ही आदिवासी वस्ती असल्यामुळे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही.”असं येथील ग्रामस्थ म्हणत आहेत. येथील ग्रामस्थांना व मुलांना ये-जा करताना अनेक अडचणी येतात.पावसामुळे चिखल होतो. रस्ता खचतो. खरंगळतो वाहतूक होत नाही. या वस्तीतून दररोज लोकांच्या शेतावर शेतमजुरीसाठी जाणाऱ्या महिलांना कच्च्या व चिखलमय रस्त्यावरून जावे लागते. पाऊस पडल्याने दलदल होते. दुर्घटना घडण्याची शक्यता असते. मग अशी एखादी घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवालही येथील महिला व ग्रामस्थ करत आहेत.प्रत्येक निवडणुकीत आश्वासन दिले जाते नंतर कोणी रस्त्याच्या डांबरी कारणाचे नावही काढत नाही. ७५ वर्षांपासूनची मागणी अद्यापही अपुरीच.. ७५ वर्षे होऊनही जर मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर हा विकास आहे का ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. पहाडदरा ठाकरवाडीला डांबरी रस्ता लवकरात लवकर करावा.अशी मागणी गावचे पोलीस पाटील निलेश भालेराव,आदिवासी संघर्ष संघटनेचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष दीपक कडाळे, संघटनेचे गाव समिती अध्यक्ष दिलीप केदारी, नितीन गावडे, रामदास कडाळे यांनी केली.