Ujjwal Nikam : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुती सत्तेत आली. केवळ सत्तेत आली असे न होता प्रचंड बहुमताने विजय मिळवत महाविकास आघाडीसह इतर सर्वच पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. यामुळे आता विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यास सुरू केले आहे. मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली असल्याने याला आणखी जोर मिळाला आहे. या सगळ्यावर आता ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकम म्हणाले, काही लोक ईव्हीएम बाबत रान पेटवत आहेत. मात्र, याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने या पूर्वीही सर्व पक्षाच्या प्रतिनिधीसमोर ईव्हीएमची विशेष तपासणी घेतली आहे. मात्र, आज पराभूत झाल्यामुळे अशा रितीने भांडवल करणे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, असे म्हणत निकम यांनी महाविकास आघाडीवर टीका देखील केली आहे. पुढे बोलताना निकम म्हणाले, ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांकडे जर प्रमाणभूत आधार असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावे लागेल. परंतु अंदाज आणि संशयावर कोणतीच गोष्ट कोर्टात टिकू शकणार नाही, असेही ते म्हणाले.