Fertilizer Ships Cross Hormuz : कृषी क्षेत्राला मोठा दिलासा.! खतांची चार जहाजे होर्मुझमधून भारताच्या दिशेने
जहाजे कृष्णपट्टणम, काकीनाडा, पारादीप आणि मुंद्रा बंदरांकडे जात आहेत. खरीप हंगामापूर्वी कृषी क्षेत्राची गरज भागवण्यासाठी आणि खतांचा सध्याचा साठा वाढवण्यासाठी या मालाचा उपयोग केली जाईल.

Fertilizer Ships Cross Hormuz – पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार करून युरिया, डीएपी आणि सल्फर वाहून आणणारी चार मालवाहू जहाजे भारतातील बंदरांच्या दिशेने मार्गस्थ झाली आहेत, अशी माहिती रसायन आणि खत मंत्रालयाने सोमवारी दिली.
ही जहाजे कृष्णपट्टणम, काकीनाडा, पारादीप आणि मुंद्रा बंदरांकडे जात आहेत. खरीप हंगामापूर्वी कृषी क्षेत्राची गरज भागवण्यासाठी आणि खतांचा सध्याचा साठा वाढवण्यासाठी या मालाचा उपयोग केली जाईल.
तसेच, १ मार्च पासून देशांतर्गत खतांचे उत्पादन १३३.१२ लाख टनांवर पोहोचले आहे, तर आयात ४३.६९ लाख टन इतकी झाली आहे. भारताने आपल्या जागतिक निविदेद्वारे १७.७० लाख टन युरियाचा पुरवठा निश्चित केला आहे. यामुळे खरीप हंगामासाठी युरिया आणि पी आणि के खतांचा एकूण निश्चित पुरवठा ९० लाख टनांच्या वर गेला आहे.
विविध देशांकडून युरियाचा पुरवठा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, रशिया, मोरोक्को, इजिप्त, अमेरिका, जॉर्डन, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया येथून डीएपी आणि एनपीके खतांचा पुरवठा लाल समुद्रामार्गे केला जात आहे.
१ मार्चपासून खतांची एकूण विक्री १५३.४ लाख टन इतकी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील १४०.२ लाख टनांच्या तुलनेत अधिक आहे. खतांची उपलब्धता सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहावी व स्थिर असावी, यासाठी राज्य सरकार, वितरण संस्था आणि सहकारी संस्थांच्या जाळ्यासोबत मिळून काम करणे सुरूच असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.






