Uday Samant : एकनाथ शिंदेंमुळेच महायुतीची सत्ता, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही शिवसैनिकांची इच्छा : उदय सामंत

Uday Samant : राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. त्यांच्या या विधानांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे. सामंत यांनी १२ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाचं श्रेय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणांना आणि निर्णयांना दिलं, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईव्हीएमवरून थेट आव्हान दिलं.
शिंदेंच्या निर्णयांमुळे महायुतीचा विजय
उदय सामंत म्हणले, मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसह अनेक जनहितकारी निर्णय घेतले. या निर्णयांना महाराष्ट्रातील जनतेने मतदानातून भरभरून प्रतिसाद दिला, आणि त्यामुळेच महायुतीला सत्ता मिळाली. त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना, त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहण्याची शिवसैनिकांची इच्छा असल्याचंही स्पष्ट केलं. “शिवसैनिकांना शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, आणि यात काही गैर नाही. सहकारी आणि विरोधकांनी यावर राग व्यक्त करण्याची गरज नाही,” असं उदय सामंत यांनी ठणकावलं.
भाजपला डिवचण्याचा प्रयत्न?
सामंत यांनी थेट भाजपचं नाव न घेता, “महायुतीच्या यशाचं श्रेय शिंदे यांना आहे,” असं सांगून अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. यापूर्वीही सामंत यांनी अनेकदा भाजपच्या नेत्यांवर टीका करत शिंदे गटाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा पुनरुच्चार केला आहे. या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राहुल गांधींना ईव्हीएमवरून आव्हान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सामंत यांनी जोरदार टीका केली. “राहुल गांधी आणि काँग्रेसचे सर्व खासदार ईव्हीएममुळेच लोकसभेत निवडून आले आहेत. जर त्यांना ईव्हीएमवर विश्वास नाही, तर त्यांनी आंदोलनापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा,” असं थेट आव्हान सामंत यांनी दिलं.





