Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवरील सत्तास्थापनेवरून महायुतीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. भाजपने विश्वासघात करत “केसानं गळा कापला” असा गंभीर आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने अनपेक्षित खेळी करत शिवसेना (शिंदे गट) ला सत्तेपासून दूर ठेवले. भाजपने अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद दोन्हीही आपल्या ताब्यात घेतले. या निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या, तर शिंदे गटाने २१ जागांवर विजय मिळवला होता. दोन्ही पक्ष महायुतीत असल्याने एकत्र सत्ता स्थापनेची शक्यता होती. यासाठी राज्य आणि स्थानिक पातळीवर बैठकीही झाल्या होत्या. मात्र, शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली. विलास भुमरे यांनी आरोप केला की, भाजपने शेवटपर्यंत चर्चेत ठेवत शिंदे गटाला ताटकळत ठेवले. दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार आणि इतर सदस्यांना आपल्या बाजूला वळवून सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषदेत भाजपचे अविनाश गलांडे अध्यक्ष तर जितेंद्र जयस्वाल उपाध्यक्ष झाले. एकूण ६३ सदस्यांपैकी ३२ सदस्य उपस्थित राहिले, तर शिंदे गटाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, भाजपचे नेते अतुल सावे यांनी पलटवार करत शिवसेनेनेच दगाबाजी केल्याचा दावा केला. “शेवटच्या क्षणी शिवसेना स्वतंत्र सत्ता स्थापनेच्या हालचाली करत होती, त्यामुळे आम्हाला आमची रणनीती बदलावी लागली,” असे सावे म्हणाले. या सर्व घडामोडींमुळे महायुतीतील तणाव उघडपणे समोर आला असून, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा थेट इशारा दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.