Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीत पुन्हा नाराजीचे सूर उमटत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास दोन तास भेट घेतली. या भेटीत राज्यातील काही भाजप नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. स्थानिक राजकारणावरून नाराजी? रायगड आणि फलटण येथे बहुमत असूनही तडजोड करावी लागल्याची भावना शिंदे गटात असल्याचे बोलले जाते. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद सत्तेतून दूर ठेवण्यासाठी हालचाली झाल्याचा आरोपही चर्चेत आहे. याशिवाय अर्थसंकल्पीय निधी वाटपात शिंदे गटाच्या मंत्र्यांबाबत दुजाभाव होत असल्याचीही नाराजी व्यक्त होत असल्याचे समजते. विरोधकांचा निशाणा या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सूचक टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांनीही महायुतीतील अंतर्गत संघर्षावर खोचक टोला लगावला आहे. शिंदेंकडून नाराजी फेटाळली दरम्यान, या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी नाराजीच्या बातम्या फेटाळून लावल्या. “प्रत्येक अधिवेशनावेळी खासदारांची बैठक घेण्यासाठी मी दिल्लीत येत असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचाली नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत शह-काटशहाचे राजकारण वाढल्याचे आधीही पाहायला मिळाले होते. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे गटाला बायपास केल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा महायुतीतील मतभेद उफाळून आले आहेत. आता शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते समेटाची भूमिका घेणार का, की अंतर्गत संघर्ष आणखी वाढणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.