Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीला ६ तर महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आता सातव्या जागेवरही महायुती उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. महायुतीत सहा जागांवर जवळपास एकमत महायुतीत ४ जागा भाजप १ जागा शिवसेना (शिंदे गट) आणि १ जागा राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळणार असल्याचे गणित आहे. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आली. त्यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांची चर्चा आहे. सातव्या जागेवरही डाव? महाविकास आघाडीत एकमेव जागेवरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. उमेदवार निश्चितीवरून मतभेद असल्याने महायुती सातव्या जागेवरही उमेदवार देऊन विरोधकांना धक्का देण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे-पवारांवर दबाव? महायुती सातव्या जागेसाठी उमेदवार दिल्यास मविआसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील रणनीतीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आता अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच राज्यसभेच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, सातव्या जागेच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.