Devendra Fadnavis : “२०२९ पर्यंत दिल्लीला जाणार नाही, माझे नेते तोपर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार” – देवेंद्र फडणवीस
गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती गेले होते.

Devendra Fadnavis – गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती गेले होते, त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यावेळी फडणवीसांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी एका माध्यमाच्या कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात जाण्याबाबतच्या चर्चांवर उत्तर दिले. माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन पण आज तरी माझे मत आहे 2029 पर्यंत मी दिल्लीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
फडणवीस म्हणाले, खूप लोकांना वाटते की, मी जर दिल्लीला गेलो तर माझे प्रमोशन होईल. काही लोकांना वाटते की, मी दिल्लीला गेले तर बला टळेल, आपल्या डोक्यावर राहणार नाही, असेही समजणारे लोक आहेत. कोणाला चांगले वाटो किंवा वाईट वाटो, २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील.
मला राजकारण कळते, माझा पक्ष कळतो, त्यामुळे दर दोन ते तीन महिन्यांनी कधी कोणाला न्यूज मिळाली नाही तर ते मला दिल्लीला पाठवतात, कधी कोणाला न्यूज क्रिएट करायची असेल तरी मला दिल्लीला पाठवतात, मला त्याचा आनंदच आहे. माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन पण आज तरी माझे मत आहे २०२९ पर्यंत मी दिल्लीला जाणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.
2030 मध्ये एक ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवू
फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र राज्य एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर असून, सध्याचा 8.8 टक्के विकासदर चांगला असला तरी राज्याला 10 टक्क्यांहून अधिक विकासदराचा टप्पा ओलांडायचा आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल जे 1 ट्रिलियन इकोनॉमीचे स्वप्न पाहत आहे, ते पूर्ण व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे.
मात्र आजचा आपला ग्रोथ रेट 8.8 टक्क्यांवर आहे. अनेक राज्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याचे स्वप्न बघत आहेत. पण आज त्या स्वप्नाच्या जवळ कोण असेल, तर केवळ महाराष्ट्र आहे, कारण आपण 660 बिलियनवर पोहोचलो आहोत. आपण ट्रिलियनच्या खूप जवळ आहोत. आपण शाश्वत विकास दर ठेवला, तर निश्चितपणे 2030 मध्ये आपण 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवू, असे त्यांनी म्हटले.






