मुंबई – महाराष्ट्र विधथानसभा निवडणुकीत सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. त्यामुळे आता कोणत्याही उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आता ८२७२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण 10900 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 1654 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर 9260 उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी 983 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या सर्व प्रकारानंतर आता 8272 उमेदवार उरले असून 20 नोव्हेंबरला या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
माहीम मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाकडून सदा सरवणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे आणि शिवसेनेचे महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ही राज्यातील सगळ्यांत लक्षवेधी लढत ठरणार आहे. तर अणुशक्ती नगरच्या जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील सना मलिक, राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील फहाद अहमद आणि शिवसेनेचे अविनाश राणे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मानखुर्द शिवाजी नगर या जागेवर समाजवादी पक्षाचे अबू आझमी, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे सुरेश पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे, तर त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. याबाबत सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली.