Maharashtra Assembly Election 2024 : “महाराष्ट्रात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो…”; बच्चू कडू यांचा मोठा दावा

Bachchu Kadu : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार काही पोलमध्ये ‘महायुती’ला तर काही पोलमध्ये ‘महाविकास आघाडी’ला जास्त जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दोन्ही आघाडीला आपल्यालाच जास्त जागा मिळतील अशी आशा आहे.
त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळवीची तयारी सुरु केली आहे. बंडखोर, अपक्ष यांना आपल्याशी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष हे या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
यादरम्यान आता प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राज्यात लहान पक्ष सत्तेत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच अपक्ष किंवा लहान पक्षातील एखादा मुख्यमंत्री ही होऊ शकतो, असा दावाही केला आहे. यामुळे राज्यात त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
बच्चू कडू म्हणाले की, ‘राज्यात लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनविणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यावा लागेल. मतदानाचा टक्का वाढला आहे. त्याला विविध कारणं आहेत. असं ते म्हणाले.
आमचे 17 मुद्दे आहेत. हे मुद्दे घेऊन आम्ही समोर जात आहोत. महाविकास आघाडीतील कुठले पक्ष एकत्र राहणार नाही त्यांना आमच्यासोबत यावं लागेल”, असं बच्चू कडू म्हणाले.
यावेळी बच्चू कडू यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं. राजकारणात काहीही होऊ शकतं. झारखंडमध्ये एक आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो. परिस्थिती बघता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. सध्या त्यांच्या विधानाची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.
माझ्या मतदारसंघात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राजकारण केले. काँग्रेस आणि भाजप हे संभ्रमात असून त्यांच्या डोक्यात फक्त बच्चू कडूला पाडण्याचा विचार आहे. पण आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास कडू यांनी व्यक्त केला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढली…
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले, गेल्या 30 वर्षातील निवडणुकांचा आढावा घेतल्यास यंदा सर्वाधिक मतदान झाल्याची माहिती आहे. सन 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.
अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी 65.10 टक्क्यांपर्यंत गेल्याचे समजते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52.07 टक्के मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे.





