LPG History in India : जागतिक राजकारणातील संघर्षांचा परिणाम केवळ देशांच्या सीमांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो आता सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही थेट परिणाम करतो. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची टंचाई जाणवू लागली असून नागरिक रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीजसमोर लांब रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात हॉटेल व्यवसाय देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सोशल मीडियावर या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. LPG History भारतातील एलपीजीचा इतिहास काय सांगतो? LPG History in India भारतामध्ये एलपीजीचा प्रवास जवळपास सात दशकांपूर्वी सुरू झाला. १९५६ मध्ये ‘ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ (ONGC) ची स्थापना झाल्यानंतर देशात तेल आणि नैसर्गिक वायू शोध मोहिमेला वेग मिळाला. मुंबई किनाऱ्याजवळील बॉम्बे हाय, आसाममधील डिग्बोई आणि कृष्णा-गोदावरी बेसिन या भागांतून तेल आणि वायू उत्पादन सुरू झाले. एलपीजीLPG हे तेलासारखे नैसर्गिक स्वरूपात सापडत नाही. एलपीजी हे प्रामुख्याने ‘प्रोपेन आणि ब्युटेन’ या वायूंच्या मिश्रणापासून तयार केले जाते. ते दोन प्रमुख मार्गांनी तयार होते कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून आणि नैसर्गिक वायूच्या प्रक्रियेद्वारे. LPG History भारतातील तेल साठ्यांचे भौगोलिक चित्र : LPG History in India सध्या आपल्याकडे आसाम, गुजरात, राजस्थान, मुंबई ऑफशोअर क्षेत्र आणि कृष्णा-गोदावरी बेसिन येथे कच्च्या तेलाचे उत्पादन होते. ऊर्जा सुरक्षिततेसाठी भारताने विशाखापट्टणम, मंगलोर आणि पुडूर येथे धोरणात्मक तेल साठे उभारले आहेत. ओडिशा आणि राजस्थानमध्ये नवीन साठ्यांच्या विकासाचे कामही सुरू आहे. आसाममधील ‘दिग्बोई’ हे भारतातील सर्वात जुने तेल क्षेत्र मानले जाते. नाहरकटिया येथे १९५३ मध्ये मोठे तेल आणि वायू साठे सापडले, तर गुजरातमधील ‘अंकलेश्वर क्षेत्र’ १९६० च्या दशकात एलपीजी उत्पादनासाठी महत्त्वाचे केंद्र बनले. LPG History एलपीजी स्वयंपाकघर कसा पोहचला : भारतामध्ये एलपीजीची पहिली ओळख १९५५ साली झाली. त्या काळात ‘बर्मा शेल कंपनी’ (नंतर भारत पेट्रोलियमचा भाग) या कंपनीने ‘बर्शाने’ या ब्रँड नावाने एलपीजी बाजारात आणले. त्या वेळी हा गॅस प्रामुख्याने शहरी भागापुरता मर्यादित होता. यानंतर ‘इंडियन ऑइल’ने १९६४ मध्ये ‘इंडेन एलपीजी’ हा ब्रँड सुरू केला. २२ ऑक्टोबर १९६५ रोजी कोलकाता येथे भारतातील पहिले घरगुती एलपीजी कनेक्शन देण्यात आले. सुरुवातीला अवघ्या दोन हजार ग्राहकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज १८ कोटींपेक्षा अधिक कनेक्शनपर्यंत पोहोचला आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातही एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आणि स्वच्छ इंधन घराघरात पोहोचले. LPG History अन् स्वयंपाक घर धूरमुक्त झाले… एलपीजीपूर्वी भारतीय घरांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा वापर होत असे. चुलींमधून निघणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये आणि मुलांमध्ये श्वसनाचे व डोळ्यांचे आजार वाढत होते. स्वयंपाकासाठी वेळ आणि श्रम अधिक लागत होते. एलपीजीच्या वापरामुळे स्वयंपाक घर धूरमुक्त झाले, वेळेची बचत झाली आणि घरगुती प्रदूषणात लक्षणीय घट झाली. भांडी आणि भिंतींवर काजळी साचणे थांबले आणि स्वयंपाकघर अधिक स्वच्छ व सुरक्षित बनले. त्यामुळे एलपीजी हा केवळ इंधन बदल नसून सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरला. LPG History भारतात किती टक्के गॅस तयार होतो? भारत एलपीजीचे उत्पादन करत असला तरी वाढत्या मागणीमुळे आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्या देशातील सुमारे ४० टक्के गॅस देशांतर्गत तयार होतो, तर जवळपास ६० टक्के गॅस आयात केला जात असल्याचं बोललं जात. भारताच्या एकूण एलपीजी आयातीपैकी सुमारे ७० टक्के पुरवठा सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती येथून येतो. उर्वरित ३० टक्के गॅस अमेरिका, अल्जेरिया आणि नायजेरिया येथून आयात केला जातो. त्यामुळे मध्यपूर्वेतील कोणताही संघर्ष भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम करू शकतो. LPG History ऊर्जा सुरक्षिततेसमोरील मोठे प्रश्न : सध्याच्या परिस्थितीमुळे ऊर्जा स्वावलंबनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वाढती लोकसंख्या, वाढती ऊर्जा मागणी आणि आयातीवरील अवलंबित्व यामुळे भविष्यात अशा संकटांची शक्यता कायम राहू शकते. तज्ज्ञांच्या मते, देशाने देशांतर्गत उत्पादन वाढवणे, पर्यायी ऊर्जा स्रोत विकसित करणे आणि ऊर्जा साठे मजबूत करणे यावर भर देणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही संकट काळात सामान्य नागरिकांना याचा थेट फटका बसणार नाही. इराण-अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेली एलपीजी टंचाई ही केवळ तात्पुरती अडचण नसून भारताच्या ऊर्जा व्यवस्थेतील वास्तव दाखवणारी परिस्थिती आहे. सात दशकांपूर्वी सुरू झालेला एलपीजीचा प्रवास आज भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला, तरी ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग अजूनही आव्हानांनी भरलेला दिसत आहे. ही बातमी वाचा : Saudi Oil Ship in India: इराणला चकवा देत सौदीतून भारतात आले तब्बल ‘एवढे’ टन तेल ; होर्मुजच्या सामुद्रधुनीतून कसे निसटले जहाज? वाचा सविस्तर