पुणे : ज्ञानेश्वरी उत्तर भारतीय वाचकांपर्यंत पोहोचावी, तिचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने ‘ज्ञानेश्वरी लालित्य’ हा ग्रंथ लिहिला असून ज्याप्रमाणे रामचरितमानस घराघरात पोहोचले तसे जिथे जिथे उत्तर भारतीय नागरिक असतील, अवधी भाषा माहिती असलेले नागरिक असतील तेथे तेथे ही हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी पोहोचेल असा विश्वास उत्तरप्रदेश सरकारच्या हिंदी समिती प्रमुख डॉ. अमिता दुबे यांनी व्यक्त केला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने संत ज्ञानेश्वरांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधत संस्थानच्या वतीने ‘ज्ञानेश्वरी लालित्य’ या हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरीचे देखील प्रकाशन कारंजे मंडपात करण्यात आले, त्यावेळी डॉ. दुबे बोलत होत्या. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे सर्व विश्वस्त, गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचे लेखक कृष्णा राजाराम अर्थात आप्पासाहेब अष्टेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख डॉ. श्यामा घोणसे, संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत तुकाराम संस्थान- देहूचे माजी अध्यक्ष तुकाराम बापूसाहेब महाराज मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘ज्ञानेश्वरी लालित्य’ या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी बोलताना डॉ. दुबे म्हणाल्या, “आज आपल्या आजूबाजूला माहितीची कितीही संसाधने वाढली असली तरी पुस्तकांना, ग्रंथांना पर्याय नाही. पुस्तकांमध्ये,ग्रंथांमध्ये जे ज्ञान मिळते, ते वाचण्याचा जो आनंद मिळतो तो कोणतीही संसाधने आपल्याला देऊ शकत नाहीत. ज्ञानेश्वरीमधून सरल आणि व्यवहारिक भाषेत गीता समजते, ज्ञानेश्वरीमध्ये असलेले भाषेचे सौंदर्य तुम्हाला अधिक समृद्ध करते.” महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचे महात्म्य जनसामान्यांना माहित आहे, मात्र महाराष्ट्राबाहेर ज्ञानेश्वरी फारशी माहिती नाही. एखाद्याला जर गीता समजून घ्यायची असेल तर गीतेवरील टीका म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी. ज्ञानेश्वरी शिवाय कोणालाही गीता समजू शकत नाही म्हणून ज्ञानेश्वरी महत्त्वाची आहे असे सांगत आप्पासाहेब अष्टेकर म्हणाले, “महाराष्ट्रात सुसंस्कृत नागरिक आहेत. महाराष्ट्रात शिक्षितांची संख्या जास्त आहे याचे कारण म्हणजे या मातीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम होऊन गेले. या भूमीला कान लावले तरी ज्ञानोबा-तुकाराम हाच ध्वनी ऐकू येईल आणि हीच या भूमीची हे ताकद आहे. उत्तर भारतात काही संकट आली तर हिमालयाच्या मदतीला कायमच सह्याद्री धावून गेला आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ज्ञानेश्वरी देखील अशीच उत्तर भारतीयांना मार्ग दाखवीत राहील.” महाराष्ट्रात वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला, त्याच पद्धतीने तो उत्तर भारतात देखील करता येईल, असा सल्लाही आप्पासाहेब अष्टेकर यांनी दिला. याशिवाय एआयच्या मदतीने, ऑडीओ- व्हिज्युअल प्रकारात तब्बल ५६ भाषांमध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी जनसामान्यांपर्यंत नेता येईल असेही अष्टेकर म्हणाले. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी सर्वांचे आभार मानले.