पुणे -पुण्यात होऊ घातलेल्या झाडांच्या कत्तलीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे “सह्याद्री देवराई’ प्रकल्पाचे संस्थापक आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी मंगळवारी सांगितले. वेताळ टेकडीवरून जाणारा बालभारती-पौडफाटा हा नियोजित रस्ता आणि नदी पुनरुज्जीवनाचे बंडगार्डन येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी शिंदे यांनी भेट दिली. प्रकल्पासाठी नदीकाठचे तोडले जाणारे वृक्ष वाचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, तसेच बालभारती-पौडफाटा रस्त्यावरील झाडांबाबतही त्यांना विनंती करेन असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले. या प्रकल्पांना पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. दोन्ही प्रकल्प महापालिका रेटत असून, या दोन्ही प्रकल्पांत हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे येथील जैवविविधता नष्ट होणार असल्याचे, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. यावेळी “वेताळ टेकडी बचाव कृती समिती’च्या डॉ. सुषमा दाते, प्राजक्ता दिवेकर उपस्थित होते. तर बंडगार्डन येथे “जीवितनदी’ संस्थेच्या शैलजा देशपांडे, वैशाली पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी मनपा बांधकाम विभागातील अधिकारी युवराज देशमुख, उद्यान विभाग अधिकारी अशोक घोरपडे, ठेकेदार हे देखील तेथे आले. शिंदे यांनी आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी फोनवर संभाषण केले. त्यावेळी पुढील आठवड्यात या विषयावर बैठक आयोजित करू असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शिंदे यांना दिले. याच पार्श्वभूमीवर वृक्ष मित्र श्री. सयाजी शिंदे ज्यांचे निस्वार्थी काम आख्या महाराष्ट्राला माहीत आहे. यांनी यातील एक ठिकाणी आज सकाळी अचानक भेट दिली. त्यांचे वृक्षांचे ज्ञान पण सर्वाना माहीत आहेच. प्रत्यक्षात पाहताना त्यानाही या त्रुटी लक्षात आल्या. त्यांनी ताबडतोब पालिकेच्या अधिकाऱ्याना बोलावून घेतले. युवराज देशमुख, उद्यान विभागाचे घोरपडे, कंत्राटदारांचे अधिकारी या सर्वांची उपस्थिती होती. सयाजी शिंदे यांनी कमिशनराना फोन करून पुढील आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. तसेच झाडांची कत्तल थांबवून जास्तीत जास्त झाडे कशी वाचतील याचा आराखडा बनवण्यास सांगितले आहे. माझ्याकडून जे शक्य होईल ते सर्व करण्याचे आश्वासन सयाजी शिंदे यांनी दिले.