Vidhan Parishad Election । विधान परिषद निवडणूक अटळ; १२ जुलै रोजी होणार मतदान

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवार शेवटचा दिवस होता. मात्र कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे. या चुरशीच्या निवडणुकीत कोणाचा गेम होणार आणि कोण विधान परिषद गाठणार याची उत्सुकता आता वाढली आहे.
विधान परिषदेसाठी भाजपने 5, शिवसेना शिंदे गटाने 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 2, तर काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येक 1 उमेदवार रिंगणात उतरवले आहे. या जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
शुक्रवारी 5 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र या कालावधीत एकानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 23 मते गरजेची आहेत.
भाजपचे पाच, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा प्रत्येक एक उमेदवार संख्या बळानुसार सहज जिंकू शकतो. तर राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांना आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. तर शिंदे आणि अजित पवारांनाही आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजूळव करावी लागेल.
कोण आहेत निवडणूक रिंगणात
या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात भाजपच्या पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यात पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत,परिणय फुके,अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना मैदानात उतरवलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना मैदानात उतरवले आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे.
कोण डेंजर झाेनमध्ये?
या निवडणुकीत कोणता पक्ष 23 मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला देणार यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. संख्या बळानुसार भाजपचे पाचही उमेदवार सहज विजयी होवू शकतात. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनाही कोणती अडचण नाही. काँग्रेसची अतिरीक्त मते मिलिंद नार्वेकरांच्या पारड्यात जाणार की जयंत पाटलांच्या यावर या दोघांचेही भवितव्य अवलंबून राहाणार आहे.
शिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची बेगमी करावी लागेल. सध्याच्या स्थितीत शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, जयंत पाटील आणि मिलींद नार्वेकर यांच्यापैकी एक जण डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा विधीमंडळात रंगली आहे.





