Latur News – जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्याने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडली आहे. लक्ष्मण भंडारे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्याचे तापमान 42 अंशांच्या पार गेले आहे. सोमवारी दुपारी लक्ष्मण भंडारे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. कडाक्याच्या उन्हात काम करत असताना भंडारे हे अचानक जमिनीवर कोसळले. शेतात उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, निलंग्याला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. माहितीनुसार, दिवसभर कडाक्याच्या उन्हात काम केल्यामुळे लक्ष्मण भंडारे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली होती. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका बसला, जो त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.