Sanjay Raut : “एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल “; राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Sanjay Raut : या टीकेला एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Sanjay Raut criticizes Eknath Shinde : ठाकरेंच्या शिवसेनेतून सहा खासदारांनी बंड करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता या खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेची अधिकृत मान्यता मिळाली आहे.
खासदारांच्या बंडखोरीनंतर काल या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचे आक्रमक नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष करत जोरदार हल्लाबोल केला.
“एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल.. लक्षात घ्या.. मी पुन्हा सांगतो ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवर हात फिरवून तुम्ही आम्हाला नितीमत्ता शिकू नका. तुमची जी काही आहे ती अमित शाह यांच्या पायाखाली घाण पडली आहे.” अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. या टीकेला एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
मशालीवर निवडून आलेले लोक तुम्ही ५०-५० कोटीला विकत घेतले
संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे काही विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली आचार्यांप्रमाणे तरीही ते आचार्य विनोबा भावे नाहीत. की ते जे बोलतील ते सत्य आहे. मशालीवर निवडून आलेले लोक तुम्ही ५०-५० कोटीला विकत घेतले, असा आरोप त्यांनी केला. तसेच मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे निर्लज्ज लोक हे गद्दार आहेत, अशा शब्दांत फुटीर खासदारांवर राऊतांनी निशाणा साधला.
राहुल गांधी यांनीच राम मंदिरातील कथित चोरीचं प्रकरण समोर आणलं
एकनाथ शिंदे स्वतः गद्दारी करण्याच्या दोन दिवसांआधी माझ्यासोबत अयोध्येला होते. तरी यांनी बंडखोरी केली. राहुल गांधी यांनीच राम मंदिरातील कथित चोरीचं प्रकरण समोर आणलं आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने रामरक्षा आंदोलन सुरू आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत शाळेतल्या मॅानिटरसारखं काय बोलता अशा शब्दांत सवाल केला. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी आधी रामरक्षा वाचावी असं म्हटलं होतं. आम्ही रामरक्षा करायला उतरलो असल्याचे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.
‘बेकायदेशीर अटक’ म्हणत सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजलींची दिल्ली हायकोर्टात याचिका






