Ichalkaranji Municipal Corporation : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतमधील अंतर्गत कलह या ना त्या कारणाने समोर येत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीत युती केली असली तरी काही ठिकाणची युती तुटली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सोडविण्यात महायुतीला यश आले असले तरी इंचलकरंजी निवडणुकीत मात्र भाजपने मोठी खेळी करत शिंदेसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला? अशी चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये रणंकदन होण्याची शक्यता आहे. इचलकरंजी मनपा निवडणुकीत मात्र महायुती होऊन सुद्धा एकमेकांच्या जागांवर एबी फॉर्म देण्याने उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठी अडचण झाली आहे. इचलकरंजी मनपासाठी महायुतीचा जागावाटपाचा फॅार्म्युला ठरला होता. शिवसेना शिंदे पक्षाला ११ जागा मिळाल्या आहेत. मात्र, पाच जागांवर भाजपाने देखील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. भाजपकडून ५६ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून १० जणांना अधिकृत उमेदवारी तर अजित पवार यांच्या गटाने १२ उमेदवारांना एबी फॅार्म दिलेले आहेत. मात्र, इचलकरंजीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एबी फार्म वाटण्याच्या घोळामुळे नक्की चाललयं तरी काय असे बोलले जात आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा मूळ फॅार्म्युला ठरल्यानुसार भाजप 54 शिंदेसेना 11 तर भाजपच्या कोट्यातून दोन जागा राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपात विसंगती निर्माण झाल्याने जागावाटपाचा फॉर्म्युला बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या-ज्या प्रभागांत महायुतीकडून दोन-तीन पक्षांचे उमेदवार उभे आहेत, त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हेही वाचा : “महाराष्ट्रातील सगळे गुंड अजित पवार यांच्या…”; संजय राऊतांच्या विधानाने राजकारण तापलं