नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाने दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यावर करण्यात आलेले आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. सन 2002 मध्ये झालेल्या गुजरात नरसंहाराच्या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू असलेल्या पद्धतशीर योजनेतूनच अहमद पटेल यांच्यावर हे खोटे आरोप केले गेले आहेत, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी या संबंधात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदींच्या अकार्यक्षमतेमुळेच आणि निरेच्छेमुळेच सन 2002 साली गुजरातेत नरसंहार झाला आणि त्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना राजधर्माचे पालन करण्याची जाहीर सूचना केली होती. मोदींच्या राजकीय सूड घेणाऱ्या यंत्रणेने आज दिवंगत नेत्यालाही सोडलेले नाही.
गुजरात सरकारची एसआयटी ही केवळ त्यांच्या राजकीय सूत्रधारांच्या इशाऱ्यावरच नाचत असून ते सांगतात तशी ही एसआयटी उठबस करीत असते. मोदींना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या प्रमुखांना नंतर कसे बक्षीस दिले जाते आणि त्यांच्या उच्चपदांवर कशा नेमणुका केल्या जातात हे आम्ही पाहिले आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
स्वतःच्या कळसूत्री बाहुल्या असलेल्या तपास यंत्रणांद्वारे न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकला जात असून मोदी-शहा यांच्या अनेक वर्षांच्या कार्यपद्धतीचाच हा एक भाग आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. जी व्यक्ती आज हयात नाही आणि आपल्यावरील आरोपींना जी उत्तर देऊ शकत नाही त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप करणे हा खोटेपणाचा कळस आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
देशावर घोंगावतंय गंभीर “अन्नसंकट’ – कॉंग्रेसचा दावा