Lakhpati Didi Pune – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा एक नवा आणि प्रेरणादायी टप्पा गाठला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात तब्बल १ लाख ८७ हजार महिला आता लखपती झाल्या असून, यातील ६४ महिलांनी तर वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून उद्योजकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सध्या सुमारे २७ हजार बचत गट कार्यरत असून, या गटांच्या माध्यमातून महिलांना टप्प्याटप्प्याने आर्थिक बळ दिले जात आहे. लखपती दीदी उपक्रमांतर्गत सुरुवातीला ३० हजार रुपयांचा फिरता निधी आणि त्यानंतर ६० हजार रुपयांचा गुंतवणूक निधी गटांना उपलब्ध करून दिला जातो. व्यवसायाची व्याप्ती आणि प्रगती पाहून दीड लाख रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, कमी व्याजदर आणि वेळेवर मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे ग्रामीण महिलांनी उद्योग क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत. महिलांच्या या भरारीत इंदापूर तालुका अव्वल ठरला असून, येथील २० हजार ८२६ महिला लखपती दीदी झाल्या आहेत. त्याखालोखाल बारामती (१९,७३७), खेड (१९,४९३), शिरूर (१७,५०३) आणि जुन्नर (१६,९९३) या तालुक्यांनीही महिला सक्षमीकरणात आघाडी घेतली आहे. केवळ पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून न राहता महिलांनी आता आधुनिक उद्योगांकडे मोर्चा वळवला आहे. यात शेळीपालन, कुक्कुटपालन, डाळ मिल, तेल घाणे यांसारख्या कृषी उद्योगांसह लोणची-पापड निर्मिती, शेवगा पावडर, मध उत्पादन, कापडी पिशव्या, बॅग, पर्स, मोत्यांचे दागिने आणि झरी वर्क यांसारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रांचा समावेश आहे. रांजणगाव गणपती परिसरातील महिलांनी तर निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी केला असून, लवकरच सॅनिटरी पॅड निर्मितीचा प्रकल्पही जिल्ह्यात सुरू होणार आहे. उत्पन्नाच्या गटवारीनुसार पाहिल्यास, जिल्ह्यात १० लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या ६४ महिला, ५ ते १० लाखांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या ३१४ महिला आणि ४ ते ५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्या ५३९ महिला आहेत. “ग्रामीण महिलांच्या हातात आर्थिक ताकद देणे हाच आमचा मुख्य उद्देश असून, महिलांकडून होणारी कर्ज परतफेडीची टक्केवारी अत्यंत समाधानकारक आहे. येणाऱ्या वर्षात ही संख्या आणखी वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” – शालिनी कडू, संचालिका, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका