Sunanda Pawar – ‘महिला, मुली आणि समाजाने अज्ञान व अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे. समाजात महिलांचे व मुलींचे विविध प्रकारे शोषण होत असून, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. खरात प्रकरण महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. अशा चुकीच्या प्रवृत्तींविरोधात समाजातील जबाबदार घटकांनी ठामपणे आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. खेड (ता.कर्जत) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील शिक्षक मारुती सायकर, बारीकराव शेटे व वालचंद यादव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉ.प्रवीण सप्तर्षी होते. तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा फेटा, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. आजी-माजी सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत निवृत्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. सत्कारमूर्तीनी आपल्या मनोगतातून दीर्घ सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या भावनिक क्षणी उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यक्रमास मुख्याध्यापक गोरक्ष भापकर, शिक्षक व कर्मचारी, तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक व राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले, तर आभार चंद्रकांत मोरे यांनी मानले. शिक्षक संदीप कदम यांनी निवृत्त होत असलेले सहकारी मारुती सायकर यांच्यावर आधारित कविता सादर करताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या सहवासातील आठवणींनी भरलेली ही कविता उपस्थितांच्याही मनाला भिडली.