Sanju Samson : तो सर्वात ‘अनलकी’ खेळाडू! सॅमसनबद्दल माजी खेळाडूचं वक्तव्य; म्हणाला, ‘त्याच्याकडे गप्प राहण्याशिवाय पर्याय नाही’

Kris Srikkanth on Sanju Samson : स्टार फलंदाज संजू सॅमसन गेल्या सुमारे १० वर्षांपासून भारतीय संघासाठी खेळत आहेत. सातत्याने संघात स्थान मिळूनही इतर खेळाडूंच्या तुलनेत त्याला अत्यंत कमी संधी मिळाल्या आहेत. अनेकदा त्याला संघातून वगळल्यामुळे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभा असूनही संधींची कमतरता अनुभवणाऱ्या खेळाडूंची यादी मोठी आहे आणि संजू सॅमसनही त्याचा शिकार आहेत. याबाबत क्रिस श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
बदलत्या फलंदाजी क्रमांकामुळे नाराजी –
या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष क्रिस श्रीकांत यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांच्या मते, संजू सॅमसन हा सध्याच्या भारतीय संघातील सर्वात ‘अनलकी’ खेळाडू आहे. भारतीय टी-२० संघात स्थान टिकवण्यासाठी संजू सॅमसनला मोठा संघर्ष करावा लागला आहे.
संघात शुबमन गिलचा समावेश झाल्याने त्याला अभिषेक शर्माचा साथीदार म्हणून ओपनिंग सोडावी लागली आणि खालच्या फळीत फलंदाजी करण्याची वेळ आली. सॅमसनने टी-२० मध्ये पाचव्या स्थानावर तीन वेळा, तिसऱ्या क्रमांकावर एकदा आणि आठव्या क्रमांकावर एकदा फलंदाजी केली आहे.
क्रिस श्रीकांत काय म्हणाले?
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना श्रीकांत म्हणाले,”संजू सॅमसन निःसंशयपणे या पिढीतील सर्वात ‘अनलकी’ क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो सलामीवीर म्हणून शतक ठोकतो, पण आता त्याला तीन ते आठ क्रमांकांदरम्यान फलंदाजीसाठी पाठवले जातेय. जर संधी मिळाली, तर ते त्याला ११ व्या क्रमांकावरही पाठवू शकतात. त्यामुळे अव्वल स्थानावर इतका चांगला खेळ केलेल्या संजूसारख्या व्यक्तीला नक्कीच वाईट वाटेल. पण, शांत राहून संघ जिथे फलंदाजी करायला सांगेल, तिथे खेळण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही.”
हेही वाचा – श्रेयस अय्यरची हेल्थ अपडेट समोर; स्वत: पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
संजू ‘फिल-इन’ खेळाडू?
संजू सॅमसनने भारतासाठी मर्यादित स्वरूपात टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत, परंतु आकडेवारी दर्शवते की त्याला जेव्हाही संधी मिळाली, तेव्हा त्याने प्रभावित केले आहे.श्रीकांत यांनी पुढे म्हटले, “हा केवळ कामगिरीचा मुद्दा नाही, तर विश्वास आणि सातत्याचा मुद्दा आहे. जर संजूसारख्या खेळाडूला सलग १५-२० सामने खेळायला दिले, तर तो संघासाठी मॅच-विनर ठरू शकतो. पण, त्याच्याकडे नेहमीच एका ‘फिल-इन’ (तात्पुरत्या) खेळाडूच्या रूपात पाहिले जाते.”





