Khed News – साकुर्डी (ता. खेड) येथील ग्रामदैवत जानुबाईमाता यात्रेनिमित्त आयोजित दोन दिवसांच्या पारंपरिक बैलगाडा शर्यतींना यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गावच्या ऐतिहासिक परंपरेचा भाग असलेल्या या शर्यतीत तब्बल 340 बैलगाड्यांनी घाटात दमदार धाव घेतली. शर्यतीदरम्यान घाट परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या दिवशी बाळासाहेब कडलग यांच्या बैलगाड्याने, तर दुसर्या दिवशी सागर शिंगाडे यांच्या बैलगाड्याने मानाचा ‘घाटाचा राजा’ किताब पटकावून उपस्थितांची दाद मिळवली. उत्सवाची सुरुवात जानुबाईमातेच्या मूर्तीला विधीपूर्वक अभिषेक व हारतुरे अर्पण करून करण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात सरपंच रोहिणी गवारी, उपसरपंच अजय चौधरी, शंकर गवारी, पोलिस पाटील संतोष लोहकरे, जानुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गुलाब कडू तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष उल्हास देवदरे यांच्या हस्ते बैलगाडा घाटाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शर्यतींना औपचारिक प्रारंभ झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमृता चोरघे, बाळासाहेब कडलग पाटील, गणेश चोरघे, तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्ष मारूती चौधरी, धोंडू भोकटे, सतु वर्ये, रोहित सुपे, तुकाराम शेळके, भरत चोरघे, सखाराम लोहकरे, काशिनाथ लाडके, प्रभाकर कोकणे यांच्यासह ग्रामस्थ, बैलगाडा मालक आणि शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. घाट परिसरात प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. स्पर्धेसाठी आयोजकांनी सुमारे तीन लाख रुपयांची रोख रक्कम व आकर्षक वस्तूरूप बक्षिसांची घोषणा केली होती. दोन दिवसांत झालेल्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी 37, दुसर्यासाठी 42, तिसर्यासाठी 61 तर चौथ्या क्रमांकासाठी 34 बैलगाडे पात्र ठरले. स्पर्धा संपल्यानंतर विजेत्या व पात्र बैलगाडा मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या संघांचा ग्रामस्थांनी जल्लोषात सत्कार केला. या बैलगाडा घाटाला परिसरातील शौकीनांसह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेचा आनंद घेतला. शर्यतीदरम्यान सुरक्षा आणि शिस्त यावर विशेष भर देण्यात आला होता. गावातील तरुणांनी वाहतूक नियंत्रण, प्रेक्षक व्यवस्थापन, पार्किंग आणि पाणीपुरवठा यांसह विविध जबाबदार्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडल्या. पुणे व मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या साकुर्डीकर ग्रामस्थांनीही उत्सवासाठी आर्थिक व नियोजनात्मक सहकार्य केले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि तरुणांच्या सुनियोजनामुळे संपूर्ण उत्सव उत्साहात, शिस्तीत आणि शांततेत पार पडल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.