Khalapur News: पाण्यासाठी देवन्हावेत जनआक्रोश! ग्रामपंचायतीच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन स्थगित
Khalapur News: ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजनांचे आश्वासन; पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत टँकर व जारद्वारे पाणी देण्याचे सरपंचांचे आश्वासन.

Khalapur News – भर पावसाळ्यातही देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीतील देवन्हावे, दहिवली आणि मिरकूटवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २७) ग्रामपंचायत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालत सरपंच रत्ना वाघमारे, उपसरपंच भगवान पाटील आणि ग्रामसेवक पी. एन. काळे यांना पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला.
यावेळी माजी सरपंच अंकित साखरे, सदस्य वृषाली नलावडे, मनोज पाटील, भूषण कडव, अल्पेश चौधरी, शुभांगी निगुडकर, नीता शिगवण आणि सुवर्णा वाघमारे उपस्थित होते. आंदोलनात उल्हास भुरके, सुधीर चौधरी, विश्वास पाटील, नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्या अनन्या साखरे, अॅड. जयेश तावडे, प्रकाश भुरके, ऋषिकेश पालांडे, गणेश नागे, शिवतेज तावडे, गुरुनाथ नलावडे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. नियमित पाणीपट्टी भरूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा योजना पूर्ववत होईपर्यंत जार व टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे सरपंच रत्ना वाघमारे यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.
“मासिक सभा आणि पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे ग्रामस्थ एकत्र येऊन जनआक्रोश आंदोलन करावे लागले. आता प्रशासनाने तातडीने उपाययोजनांचे आश्वासन दिले आहे.”
– अनन्या साखरे, ग्रामपंचायत सदस्या





