Gram Panchayat Election: ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित, पाहा नवीन वेळापत्रक
Gram Panchayat Election: राज्य निवडणूक आयोगाकडून ४ ऑगस्ट रोजी होणारी अंतिम मतदार यादी प्रसिद्धी स्थगित; मयत, दुबार व बोगस नावे वगळण्यासाठी निर्णय.

Gram Panchayat Election – राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी येत्या ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एसआयआर मोहिमेनंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगास विनंती केली आहे.
यावरून जिल्ह्यातील सुमारे ७५४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी वापरण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरीत, तसेच बोगस मतदारांची नावे वगळून अद्ययावत होणारी मतदार यादीचा वापर होणार आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या, तसेच डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ७५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, यंदा सरपंचपदाची थेट जनतेतून निवड होणार आहे. त्यानंतर सदस्यपद आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. आता प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे बाकी होते. त्याचा कार्यक्रमही जाहीर करून अंतिम मतदार यादी दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र, एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध करण्यास स्थगिती दिली आहे.
निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये?
एसआयआर मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक होणार असून, बोगस, दुबार मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. त्यानुसार केंद्रीय निवडणुक आयोगाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी, तर अंतिम मतदार यादी दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.






