Pune News : खडकवासला धरणसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात; पाणी कपातीचे संकट टळणार

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पहिल्यांदाच मे महिन्यातच वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. दरवर्षी मान्सूनच्या आगमनानंतर दहा ते बारा दिवस सलग पाऊस झाल्यास पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते.
मात्र, यंदा अवकाळी पावसाने मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेस मोठा दिलासा मिळणार असून पाणीकपातीचे संकट टळणार आहे. पहिल्याच दिवशी या चारही धरणांमध्ये २८ एमएलडी पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
पाणलोट क्षेत्रात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. खडकवासला १६ मिमी, पानशेत ९९ मिमी, वरसगाव ९२ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील काही दिवस पावसाचा जोरही वाढणार आहे. शहराला खडकवासला धरणासाखळी प्रकल्पातील वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो.
या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. या धरणातून शहरासह, जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना आणि सिंचना योजनांसाठी पाणी दिले जाते. मागील वर्षी ही चारही धरणे १०० टक्के भरली असली तरी यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे हा पाणीसाठा साडेपाच टीएमसीपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मागील काही वर्षांप्रमाणेच जून महिन्यातच कपात ओढावण्याची शक्यता होती. मात्र, यंदा मे महिन्यातच पाणी वाढण्यास सुरुवात झाली.
जून अखेरीनंतर होते पाणीसाठ्यात वाढ
शहरात तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस होत असला तरी, उन्हाळ्यामुळे जमीन तापल्याने तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनानंतरच धरणांमधे पाणीसाठ्यास सुरुवात होते. सर्वसाधरणपणे जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते.
मात्र, यंदा मे महिन्यातच या चारही धरणांत १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने २६ मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर दिवसभरात महापालिकेचा शहराचा पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा ५.७० टीएमसी झाला आहे. त्यामुळे आता या पुढे धरणात येणारे पाणी वाढतच जाणार आहे.





