पुणे – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मानाच्या समजल्या जात असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आपला संघ जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधवकडे सोपवण्यात आले असून नविन खेळाडूंमध्ये सात्तत्याने सरस कामगिरी केलेल्या ओंकार खाटपे याला संधी देण्यात आली आहे.
यंदाच्या मोसमास येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्राचा एलिट ‘अ’ गटात समावेश असून मणिपूर, झारखंड, राजस्थान, हरियाना, सौराष्ट्र, विदर्भ, सेनादल हे गटातील अन्य संघ आहेत. या संघात प्रशांत सोळंकी या मुंबईच्या लेगस्पिन गोलंदाजाचा व्यावसायिक खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. याआधी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत मुंबईकडून खेळणारा प्रशांत सोळंकी चार दिवसांच्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्राकडून पदार्पण करेल. प्रशांत सोळंकीच्या बरोबरीने ओंकार खाटपे, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज, ओम भोसले आणि धनराज शिंदे हे खेळाडू रणजित पदार्पण करणार आहेत.
महाराष्ट्राचा पहिला सामना सोलापुरमध्ये मणिपूर संघाविरुद्ध ५ ते ८ जानेवारी दरम्यान होत आहे. दुसरा सामना झारखंड संघाविरुद्ध १२ ते १५ जानेवारी या कालावधीत होत आहे. तिसरा सामना राजस्थानशी १९ ते २२ दरम्यान जोधपूरला, चौथा सामना हरियानाशी २६ ते २९ दरम्यान, पाचवा सामना विदर्भ संघाशी २ ते ५ फ्रेबुवारी या कालावधीत तर सहावा सामना सेनादलशी १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणार आहे.
महाराष्ट्राचा रणजी संघ – केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, सिद्धेश वीर, अंकित बावणे, निखिल नाईक, अझिम काझी, अक्षय पालकर, ओंकार खाटपे, रामकृष्ण घोष, प्रशांत सोळंकी, हितेश वाळुंज, प्रदिप दाढे, ओम भोसले, विकी ओस्तवाल, धनराज शिंदे, विशांत मोरे.