शिक्रापूर- सामाजिक बांधिलकीचा विचार जपून समाजातील गरीब आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असून, अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवनज्योत सामाजिक विकास संस्था नेहमी प्रयत्नशील असल्याचे मत संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर येथील जीवनज्योत सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आनंदाश्रम आश्रम शाळा तळेगाव ढमढेरे येथे मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्योती पाटील या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अशोक वाडिले होते. यावेळी संस्थेच्या वतीने आश्रमशाळेतील 240 अनाथ विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू, खाऊ तसेच धान्याचे वाटप करण्यात आले. आश्रमशाळेतील मुलांना राख्या बांधून या मुलांच्या पाठीशी उभी राहण्याची ग्वाही देखील यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आली. जीवनज्योत संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूरमध्ये 120 महिला बचतगट कार्यरत असून गटातील महिला सदस्यांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्याबरबरच त्यांचे सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते. महिला आर्थिकदृष्ट्य्ा स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने संस्था नेहमीच प्रयत्नशील राहत असून, आज अनेक सामान्य महिलांना ही संस्था आधारवड असल्यासारखी वाटते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव अबोली पाटील, सोनाली गवारे, अनिता बेलोटे, उज्वला पवार, संगीता आगरकर, प्राजक्ता लिंबळे, मंजुषा बांगर, चेतना चौधरी, सोनाली कहाणे, सुप्रिया चौगुले, अश्विनी चौधरी, सायली दुधाडे, किरण डुंबरे यांसह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आश्रम शाळेतील प्रा. विलास वाघ, शोभा पवार, विजय भोर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले तर संदीप गोसावी यांनी सूत्रसंचालन केले व केशव पवार यांनी आभार मानले.