Junnar News: शिवरायांच्या जन्मभूमीत रस्त्यांची चाळण! जांबुतफाटा-भोरवाडी ते बोरी-आळंदी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
Junnar News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा स्थानिकांचा इशारा.

Junnar News – छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून जगभर ओळखल्या जाणार्या जुन्नर तालुक्यातील जांबुतफाटा-भोरवाडी, बोरी-बेल्हे, बोरी-आळे तसेच बोरी-आळंदी या महत्त्वाच्या मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पावसामुळे साचणारे पाणी यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या मार्गांचा वापर शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार, व्यापारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांसाठी हा प्रवास अधिक धोकादायक बनला आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा तालुका आहे. निवडणुकीच्या काळात शिवरायांचे नाव घेऊन विकासाच्या घोषणा केल्या जातात आणि मतदारांकडे मतदान मागितले जाते. मात्र, याच ऐतिहासिक भूमीतील नागरिकांच्या मूलभूत रस्ते समस्येकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत असेल, तर हा विकासाचा नेमका कोणता नमुना? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरवर्षी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा या मार्गांचे शास्त्रोक्त पद्धतीने मजबुतीकरण, दर्जेदार डांबरीकरण, आवश्यक ठिकाणी रुंदीकरण तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटारे व मोर्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकार्यांना प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.





