Junnar News – परिसरात यंदा कांद्याची शेते डोलत आहेत. फुलोरेही बहरलेले दिसतात; मात्र या देखाव्यामागे एक चिंताजनक वास्तव दडले आहे. फुले उमलूनही अपेक्षित प्रमाणात बीजधारणा होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. यामागे परागीभवनासाठी अत्यावश्यक असलेल्या मधमाशांची लक्षणीय घट कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जुन्नर तालुका हा कांदा बीजोत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या गुंतवणुकीवर दर्जेदार बियाणे तयार करतात; मात्र यंदा अनेक शेतांमध्ये फुलोरे उमलूनही बोंडांमध्ये बीज भरत नसल्याचे दिसत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या पिकात मधमाशांची भूमिका ‘निसर्गातील अदृश्य मजूर’ अशीच आहे. एका फुलावरून दुसर्या फुलावर परागकण नेण्याचे काम त्या सातत्याने करतात. या प्रक्रियेमुळे बीजधारणा चांगली होते आणि बियाण्याची गुणवत्ता टिकून राहते. पूर्वी फुलोर्यावर सतत गुणगुणाट ऐकू यायचा; आता मात्र शांतता जाणवते, असे एका शेतकर्याने सांगितले. तज्ज्ञांच्या मते ही समस्या केवळ स्थानिक नसून व्यापक पर्यावरणीय बदलांचे द्योतक आहे. रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, हवामानातील अनियमितता, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि नैसर्गिक अधिवासांचे नष्ट होणे यामुळे मधमाशांची संख्या कमी होत आहे. कांदा बीजोत्पादन शासनाने प्रशिक्षण, अनुदान व जनजागृती कार्यक्रम राबविल्यास शेतकरी मधमाशी संवर्धनाकडे अधिक गांभीर्याने वळू शकतात. मधमाशांची घट ही केवळ कांदा बीजोत्पादनापुरती मर्यादित समस्या नाही; ती संपूर्ण शेती व्यवस्थेसाठी गंभीर इशारा आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांत उमललेल्या कांद्याच्या फुलांनी जणू एकच प्रश्न उपस्थित केला आहे- निसर्गाचा समतोल राखला नाही, तर पुढील हंगामात फुलोरा तरी दिसेल का? “मधमाशा आकर्षित व्हाव्यात म्हणून आम्ही शेताभोवती सूर्यफुलाची लागवड केली. तरीही अपेक्षित प्रमाणात मधमाशा दिसत नाहीत. परागीभवन नीट न झाल्याने बीजधारणा घटते आहे.” – भास्कर आहेर, कांदा बी उत्पादक बियाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम माळशेज परिसर येथे अनेक शेतकर्यांनी यंदा बीजोत्पादनासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. रोपे, मजुरी, सिंचन आणि औषधांवरील खर्च वाढलेला असताना उत्पादनात 30-40 टक्के घट झाल्यास मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी, येत्या हंगामात बाजारातील बियाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ शकतो. उपाययोजनांची गरज -रासायनिक कीटकनाशकांचा मर्यादित व संतुलित वापर -सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब -मधमाशी पालन (बी-कीपिंग) प्रोत्साहन -शेताभोवती विविध फुलझाडांची लागवड करून परागीभवनास पूरक वातावरण निर्माण करणे