Chief Justice Bhushan Gavai – डिजिटल युगात मुलींच्या संरक्षणाला प्रशासनाने सर्वाधिक प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी म्हटले आहे. मुलींचे संरक्षण म्हणजे केवळ वर्गात आणि कामाच्या ठिकाणीच तिला सुरक्षित ठेवणे नव्हे, तर डिजिटल विश्वातही तिचे भविष्य सुरक्षित करणे होय, असेही त्यांनी नमूद केले. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना भूषण गवई म्हणाले, आजच्या काळात तरुण मुलींना भेडसावणारे धोके केवळ भौतिक विश्वापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते अनियमित डिजिटल जगातही पसरले आहेत. आजच्या युगात इनोव्हेशन प्रगतीची व्याख्या बनली आहे, त्यामुळे तिथे तंत्रज्ञानाचा वापर शोषणाऐवजी मुक्तीचे साधन म्हणून केला पाहिजे, असे सरन्यायाधीश म्हणाले. डिजिटल विश्वात मुलींचे संरक्षण हे प्रशासनाचे मुख्य प्राधान्य असले पाहिजे. याचबरोबर ऑनलाइन लैंगिक शोषण, डिजिटल तस्करी आणि सायबर छळाशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे आणि संधींचे नवे मार्ग खुले केले आहेत. परंतु त्यामुळे तरुण मुलींसाठी मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे. यामध्ये ऑनलाइन छळ आणि सायबर धमकीपासून ते वैयक्तिक डेटाचा गैरवापर व डीपफेक इमेजरीपर्यंत अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. ऑनलाइन लैंगिक शोषण, डिजिटल तस्करी आणि सायबर छळ यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण आणि जागरूकतेची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर शोषणाऐवजी मुक्तीचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात करायला हवा, असे ते म्हणाले.